आज आपण घरबसल्या टीव्ही वर क्रिकेट सामन्याचा आनंद घेवू शकतो, उत्तम व्यावसायिक शिक्षण मिळवण्यासाठी IIM अहमदाबाद मध्ये जाण्याची स्वप्ने पाहतो, किंवा इस्रो ची कामगिरी पाहून भारतीय असल्याचा अभिमान मिरवतो हे सगळ आज ज्या व्यक्तीमुळे शक्य झाले आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच भारतीय अवकाश विज्ञानाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई. आज त्यांचा स्मृतिदिन.त्या अनुषंगाने डॉ. विक्रम साराभाई यांच्या दैदिप्यमान अवकाश भरारीचा आणि त्यांच्या भारतीय अवकाश संशोधनातील अतुल्य योगदानाचा घेतलेला हा आढावा.
संक्षिप्त जीवन इतिहास:
अगदी लहानपणापासुनच विज्ञानाचा वारसा लाभलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे फार मोठे उद्योगपती होते तर आई सरला देवी एक नावाजलेल्या स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अतिशय प्रतिष्टीत घराण्यात जन्म झाला असल्या कारणाने लहानपासुनच त्यांना जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांसारख्या भारतातील त्यावेळच्या दिग्गज नेत्यांचा आणि समाजसुधारकांचा सहवास मिळाला. सुखसंपन्न घरात जन्म होवून सुद्धा त्यांचे आजन्म कार्य हे देशातल्या जनतेसाठीच राहिले. त्यांना लहानपासुनच विज्ञानात खूप रस होता. त्यांच्याकडे असणाऱ्या स्टीम इंजिन सोबत ते तासनतास खेळायचे.विक्रम साराभाई यांचे प्रथामिक शिक्षण त्यांच्या पालकांनीच स्थापन केलेल्या खाजगी मॉन्टेसरी शाळेत झाले. पुढे १९३७ मध्ये अहमदाबादच्या कॉलेजमधून पदवी संपादन करून उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी १९40 मध्ये “नॅचरल सायन्स” मधून पदवी चे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परत आल्यावर त्यांनी Indian Institute of Science, Bangalore या संस्थेत प्रवेश घेतला. १९४२ मध्ये त्यांनी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पहिला वैज्ञानिक शोधनिबंध ‘टाइम डिस्ट्रिब्युशन ऑफ कॉस्मिक रे’ प्रकाशित केला. इथून खर्या अर्थाने त्यांचा वैज्ञानिक प्रवास चालू झाला. त्याचसोबत वैवाहिक प्रवास सुद्धा. कारण, याच वर्षी त्यांचे लग्न एक प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी यांच्यासोबत झाले. विज्ञानात विशेष रुची असणाऱ्या विक्रम साराभाई यांना कला, नृत्य, काव्य यांच्यात सुद्धा खूप रस होता. या जोडप्याला दोन मुले होती; मुलगी मल्लिका आणि मुलगा कार्तिकेय. मल्लिका साराभाई एक सुप्रसिद्ध नृत्यांगना, तसेच सामाजिक कार्यकर्त्या आहेत, तर मुलगा कार्तीकेय पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात. ते CEE अर्थात Centre for Environment Education चे संस्थापक आहेत.विक्रम साराभाई यांचे संशोधन कॉस्मिक रे अर्थात वैश्विक किरणे यासंदर्भात होते. जेंव्हा ते सुट्टीसाठी हिमालयात गेले तेंव्हा जमिनीपासून खूप उंचावर असणाऱ्या जागेचे वैश्विक किरणांच्या संशोधनात किती महत्व आहे हे त्यांना समजून आले.दरम्यान कॉस्मिक किरणांवरील संशोधन पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा केंब्रिज विद्यापीठात गेले आणि १९४७ मध्ये "Cosmic Ray Investigations in Tropical Latitudes" हा प्रबंध सदर करून पीएचडी पदवी प्राप्त केली. जेंव्हा ते पीएचडी होवून भारतात आले तेंव्हा आपला देश नुकताच स्वतंत्र झाला होता. विक्रम साराभाई यांच्याकडे केम्ब्रिज विध्यापिठाची पदवी होती, भरपूर पैसा होता, देशातल्या बड्या नेत्यांचे घरी येणे जाने होते, परदेशात काम करण्याची संधी होती, मात्र त्यांनी ती संधी नाकारली आणि देशासाठी काहीतरी करायचे ठरवले. त्यांनी एक खूप मोठे स्वप्न पहिले ते म्हणजे भारताला अवकाशात नेण्याचे स्वप्न. त्याकाळी असे स्वप्न पाहणे म्हणजे हास्यास्पद होते. त्यांनी जेंव्हा ही गोष्ट त्यांच्या सहकार्यांना सांगितली तेंव्हा त्यांना सांगण्यात आले कि आपला देश हा गरीब आणि विकसनशील देश आहे, त्याला खाण्यासाठी भाताची गरज आहे, रॉकेट ची नाही. लोकांनी प्रश्न केला कि भारतासारख्या गरीब देशाला अवकाश तंत्रज्ञानाची काय गरज? तेंव्हा विक्रम साराभाई यांनी अत्यंत आत्मविश्वासाने त्यांना समजावले कि, भारत हा गरीब देश आहे म्हणूनच याला अवकाश तंत्रज्ञानाची गरज आहे, कारण अवकाश तंत्रज्ञानच या देशाची समस्या सोडवू शकते. अवकाश तंत्रज्ञानात ती क्षमता आहे जी आपल्याला प्रगत देश बनवू शकते. त्यावेळी त्यांनी लोकांना जे सांगितले ते इतके पटलेही नसेल पण, आज त्याची प्रचीती येत आहे. जे तंत्रज्ञान रॉकेट लौंच मध्ये वापरले जाते तेच तंत्रज्ञान हल्ल्यात वापरल्या जाणार्या मिसाईल मध्ये वापरले जावू शकते. Satellite मुळे मुलांना घरबसल्या शिक्षण देता येत आहे. इतर समस्यावर उपाय सुद्धा अवकाश तंत्रज्ञान देवू शकते याची खात्री त्यांना होती. त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याआधी त्यांच्यासमोरच्या आव्हानांना सामोरे जावे लागले होते. आणि आव्हानांची यादी खूपच मोठी होती. ना आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर होते, ना लीडर होते, ना भरमसाठ पैसा. पण एक गोष्ट नक्की होती म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास. त्याच्या जोरावर त्यांनी प्रगत राष्ट्रांना आपल्यासोबत काम करण्यासाठी राजी केले. अमेरिकेने आपल्याला रॉकेट देवू केले, फ्रांस ने पेलोड देवू केले, हे सर्व साहित्य एका बैलगाडीतून तुंबा लौन्चींग स्टेशन पर्यंत नेण्यात आले आणि २२ नोव्हेंबर १९६३ रोजी भारतभूमीवरून पहिले सौन्डीग रॉकेट लौंच झाले. विक्रम साराभाई यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविली.
1.भारतात चांगल्या वैज्ञानिकतेची गरज आहे हे ओळखून डॉ. विक्रम साराभाई यांनी घरच्या चारीटेबल ट्रस्टच्या तसेच मित्रांच्या सहयोगाने ११ नोव्हेंबर १९४७ मध्ये वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी भौतिक संशोधन प्रयोगशाळा म्हणजेच Physical Research Laboratory (PRL) ची स्थापना केली. पुढे जाऊन ही प्रयोगशाळा वैश्विक किरण आणि अवकाशासाठी समर्पित असलेली जगभरातील एक अग्रगण्य संशोधन संस्था बनली. कदाचित विश्वास बसणार नाही पण जगभरात नावाजलेल्या या संस्थेची सुरुवात विक्रम साराभाई यांनी स्वताच्या घरात एका खोलीमध्ये केली होती.
2.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ची स्थापना ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. रशियन स्पुटनिक प्रक्षेपणानंतर भारतासारख्या विकसनशील देशासाठी अंतराळ कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी सरकारला यशस्वीपणे पटवून दिले. 1960 च्या दशकात भारतात अंतराळ उपक्रमांना सुरुवात झाली होती. त्याच दरम्यान अमेरिकेने सोडलेल्या Syncom ३ या उपग्रहाच्या माध्यमातून टोकियो मध्ये चालू असलेल्या ओलम्पिक स्पर्धेचे प्रत्यक्ष प्रक्षेपण चालू होते. तेंव्हा विक्रम साराभाई यांनी भारत देशासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे असलेले महत्व ओळखले. भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात करण्यासाठी त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या तरबेज आणि पात्र असलेल्या तमाम शास्त्रज्ञ, उद्योजक आणि समाज शास्त्रज्ञांना एकत्र आणले आणि १९६२ रोजी डिपार्टमेंट ऑफ आटोमिक एनर्जी च्या अंतर्गत Indian National Committee for Space Research (INCOSPAR) ची स्थापना केली. त्यानंतर ऑगस्ट १९६९ मध्ये याचेच रुपांतर इसरो मध्ये झाले. पुढे भारत सरकारने १९७२ मध्ये स्पेस कमिशन निर्माण करून ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’ (DOS) स्थापन केले आणि इसरो ला DOS च्या अंतर्गत आणले. त्यानंतर isro ची कामगिरी आपण सर्वजण पाहत आहोतच. प्रत्येक भारतीयाने इसरो चा अभिमान मिरवत असताना इसरो च्या स्थापनेत सिंहाचा वाटा असणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांना विसरता कामा नये.
3. उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांच्यासोबत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ११ डिसेंबर १९६१ रोजी IIM अहमदाबाद स्थापन झाले. IIM अहमदाबाद देशात दुसरे IIM होते आणि विक्रम साराभाई या संस्थेचे संस्थापक संचालक होते. त्या काळी सगळे उद्योगपती मुंबई मध्ये राहत असल्याने प्रत्येक मोठी संस्था मुंबई मध्ये स्थापन केली जायची, मात्र, विक्रम साराभाई यांनी IIM मात्र अहमदाबाद मध्येच स्थापन करण्याचे ठरवले. आज IIM अहमदाबाद हे देशातील व्यावसायिक शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र आहे तर जगातल्या नामांकित केंद्रापैकी एक म्हणून गणले जाते.
4. अहमदाबादस्थित CEPT विद्यापीठ (Centre for Environmental Planning and Technology) या पर्यावरण नियोजन आणि तंत्रज्ञान केंद्राच्या स्थापनेमागील ते प्रेरक शक्ती होते. 1962 मध्ये स्थापन झालेल्या या विध्यापिठात आर्किटेक्चर, नियोजन आणि तंत्रज्ञान इ. शाखांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर आणि डॉक्टरल शिक्षण दिले जाते.
5. भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी भारतातील पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी डॉ. साराभाईंना पाठिंबा दिला. प्रामुख्याने विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे हे केंद्र अरबी समुद्राच्या किनार्यावर तिरुअनंतपुरमजवळ थुंबा येथे स्थापन करण्यात आले. पायाभूत सुविधा, कर्मचारी, दळणवळण आणि लाँच पॅड उभारण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नानंतर, 21 नोव्हेंबर 1963 रोजी सोडियम व्हेपर उड्डाण पेलोडसह केंद्र सुरू करण्यात आले.
6. १९६३ मध्ये विक्रम साराभाई यांनी PRL च्या अंतर्गत Group for Improvement of Science Education (GISE) ची स्थापना केली. विद्यार्थी आणि सामान्य लोकांमध्ये विज्ञान आणि गणित शिक्षणाच्या बाबतीत जागृती व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि विज्ञान शिकवताना नवनवीन कल्पनांना चालना मिळावी हा उद्देश या संस्थेचा होता. १९६६ मध्ये याचेच Community Science Centre (CSC) मध्ये एक स्वतंत्र संस्था म्हणून रुपांतर झाले. नंतर १९७१ मध्ये याचेच Vikram A Sarabhai Community Science Centre (VASCSC) असे नामांतर करण्यात आले. लोकांमध्ये विद्यानाची जागृती व गोडी निर्माण करण्यासाठी या संथेचे मोलाचे काम केले आहे आणि आजही तितक्याच तळमळीने हे कार्य चालू ठेवले आहे.
7. 1965 मध्ये विक्रम साराभाई यांनी नेहरू फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट (NFD) या चारीटेबल ट्रस्ट ची स्थापना केली. हे ट्रस्ट ग्रामीण विकास आणि पर्यावरण जागृती यासाठी समर्पित आहे. सामाजिक आणि वैयक्तिक विकासाच्या वर्तमान समस्यांवर मूलभूत अभ्यास या माध्यमातून केला जातो.
8. विमान अपघातात होमी भाभा यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर विक्रम साराभाई यांची अणुऊर्जा विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ती जबाबदारी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निभावली.
9. भारतामध्ये कापड उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी कस्तुरभाई लालभाई आणि शांतीस्वरूप भटनागर यांचासामावेत Ahmedabad Textile Industry's Research Association (ATIRA) ची स्थापना केली. ते या संस्थेचे पहिले संचालक सुद्धा राहिले आहेत.
10. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे जाऊन अंध पुरुष संघटना (BMA) स्थापन केली जी दृष्टिहीनांना मदत करते.
11. पत्नी मृणालिनी साराभाई यांच्यासोबत त्यांनी दर्पण अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली. या संस्थेत शास्रीय नृत्य, शास्रीय गायन तसेच शास्त्रीय वादनाचे धडे मिळतात. भारतीय कला क्षेत्रातील ही एक नामांकित आणि अग्रगण्य संस्था मानली जाते.
12. त्यांनी स्थापन केलेल्या इतर सुप्रसिद्ध संस्थांमध्ये कल्पक्कममधील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर (FBTR), त्याचसोबत कलकत्ता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन प्रकल्प, हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) आणि जादुगुडा, झारखंड येथील युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) यांचा समावेश आहे.
13. 1966 मध्ये डॉ. साराभाई यांचा नासाशी झालेल्या संवादाचा परिणाम म्हणून, सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरीमेंट (SITE) प्रोग्राम जुलै 1975 - जुलै 1976 मध्ये लौंच करण्यात आला. (जेव्हा डॉ. साराभाई नव्हते)
14. डॉ. साराभाईंनी भारतीय उपग्रहाच्या निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी एक प्रकल्प सुरू केला. परिणामी, आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह 1975 मध्ये रशियन कॉस्मोड्रोममधून कक्षेत ठेवण्यात आला होता. भारताने अंतराळात ठेवलेले हे पहिले पाऊल होते.
15. अवकाश तंत्रज्ञानात उत्तुंग भरारी घेणाऱ्या या अवलीयाचा अंत मात्र अनपेक्षित झाला. थुंबा पायाभरणी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते तिरुअनंतपुरमला गेले होते. नव्याने तयार केलेल्या थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची सेवा देण्यासाठी स्टेशन बांधले जात होते. त्याचवेळी 30 डिसेंबर 1971 रोजी तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई यांचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी झोपेत निधन झाले.
16. डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांच्या लिखाणात अंतराळ कार्यक्रमाच्या महत्त्वावर जोर दिला आहे, ते म्हणतात:
"असे काही लोक आहेत जे विकसनशील राष्ट्रातील अंतराळ क्रियावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आमच्यासाठी, उद्देशाची कोणतीही संदिग्धता नाही. चंद्र किंवा ग्रह किंवा मानव अवकाश उड्डाणांच्या शोधात आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांशी स्पर्धा करण्याची आम्हाला कल्पना नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की जर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रांच्या समुदायामध्ये अर्थपूर्ण भूमिका बजावायची असेल, तर माणूस आणि समाजाच्या वास्तविक समस्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आपण कोणाच्याही मागे नसावे."
17. त्यांनी स्थापन केलेल्या काही सुप्रसिद्ध संस्था आहेत,
- Physical Research Laboratory (PRL), Ahmedabad
- Indian Institute of Management (IIM), Ahmedabad
- Community Science Centre, Ahmedabad
- Darpan Academy for Performing Arts, Ahmedabad (along with his wife)
- Vikram Sarabhai Space Centre, Thiruvananthapuramm
- Space Applications Centre, Ahmedabad (This institution came into existence after merging six institutions/centres established by Vikram Sarabhai)
- Faster Breeder Test Reactor (FBTR), Kalpakkam
- Variable Energy Cyclotron Project, Calcutta
- Electronics Corporation of India Limited (ECIL), Hyderabad
- Uranium Corporation of India Limited (UCIL), Jaduguda, Bihar
विक्रम साराभाई यांना त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी विविध प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
- त्यांना 1962 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने तर
- 1966 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- 1972 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवरची खूप प्रतिष्ठेची स्थाने भूषवलेली आहेत.
१९६२ साली झालेल्या Indian Science Congress च्या Physics section चे ते President होते.
१९७० मध्ये व्हीअना येथे पार पडलेल्या International Atomic Energy Association चे ते President होते.
१९७१ सालच्या चौथ्या युनायटेड नेशन 'Peaceful uses of Atomic Energy' कॉन्फरन्स चे ते Vice President होते.
त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ...
तिरुअनंतपुरम येथील स्पेस सेंटर ला विक्रम साराभाई स्पेस सेंटर, (VSSC), हे नाव त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे.
1974 मध्ये, सिडनी येथे इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने निर्णय घेतला की, चंद्रावरील BESSEL हे विवर साराभाई विवर म्हणून ओळखले जाईल.
अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून देशाला आंतराष्ट्रीय पातळीवर एक विशेष ओळख मिळवून देणाऱ्या या सच्च्या देशभक्ताला आजच्या दिवशी स्मरुया आणि त्यांनी जे स्वप्न पहिले त्यासाठी सारे मिळून प्रयत्न करूया. जेंव्हा आपला देश अवकाश तंत्रज्ञानात जगात अव्वल ठरेल तिच डॉ. विक्रम साराभाई यांना खरी आदरांजली ठरेल.
धन्यवाद.